चिपळूण- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार रमेशराव कदम हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमांमध्येच बोलताना रमेश कदम यांच्या राजकीय वाटचालीचे कौतुक करतानाच महिनाभरात ते एका चांगल्या निर्णयावर येतील असे स्पष्टसंकेत दिले.
पालकमंत्री उदय सामंत हे चिपळुणात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनसाठी आले होते. त्यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी माजी आमदार रमेशराव कदम यांचे तोंड भरून कौतुक केले. आपण आपल्या राजकीय जीवनाच्या प्रारंभीच्या व युवा काळामध्ये रमेशरावांचे कसे मार्गदर्शन घेत होतो आणि भाईनी आपल्याला कसे सहकार्य केले हेही आवर्जून सांगितले. पालकमंत्री बनण्यासाठी रमेशरावांनीच शब्द टाकला होता आणि म्हणूनच आपण पहिल्यांदा पालकमंत्री बनलो हा सुद्धा उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला. रमेश कदम म्हणजे संघर्ष, परंतु भाईंनी मला राजकीय मदत केली त्यावेळी असा विचार केला नाही की, हा मुलगा पुढे जाऊन आपल्यापेक्षा मोठा होईल. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता त्यांनी कामे केली. एक काळ चिपळूण तालुका त्यांच्या शब्दावर डोलायचा आणि जिल्हा हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहायचा अशी ही पुस्तीही सामंत यांनी जोडली. उदय सामंत यांनी पुढे बोलताना मुख्य मोठा खुलासा केला की, कार्यक्रमाला येताना मी भाई आणि आमदार शेखर निकम एकत्र गाडीतून आलो. आमची सविस्तर चर्चा झाली येत्या महिन्याभरातच भाई एक चांगला निर्णय घेतील असे मी आत्ताच सांगतो. उदय सामंत यांचे बरेचसे भाषण रमेशराव कदम यांचे कौतुकावरच झाल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. रमेशराव कदम आणि उदय सामंत यांच्या शाब्दिक देवाणघेण्यातून रमेश कदम आता शिवसेनेमध्ये प्रवेश करते होतील असे चित्र दिसत आहे. जर असे झाले तर चिपळूण तालुक्यातील राजकारण खूपच बदलेल आणि खास करून येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये याचा मोठा परिणाम दिसून येईल हे निश्चित आहे.