चिपळूण – चिपळूण शहरातील राष्ट्रीय महामार्गातचा पूल गणपती सणात सुरू करण्याचे नियोजन सध्यातरी रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनामिका जाधव मॅडम यांनी ‘कोकण एक्सप्रेस ‘शी बोलताना दिली. त्याऐवजी शहरातील पुलाखालची कोकणाकडे जाणारी एक लेन वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी पुढे सांगितले.
चिपळूण शहरातून बहादूरशेख नाका ते बौद्धवाडीपर्यंत पुलाचे काम सुरू आहे. या गणपती सणामध्ये पूलावरून एक लेन सुरू करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनातर्फे करण्यात आला होता. मात्र सर्व तयारी व नियोजन करूनही या पुलाचे दोन्ही बाजूच्या प्रारंभीच्या टप्प्यात भरावाचे काम पावसामुळे विस्कळीत होत आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी सांगितले की, बारा मीटरचा भराव करण्याचे काम सुरूही करण्यात आले होते परंतु पावसामुळे हा भराव खचला जात आहे. हा भराव एकसंध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या अप्रोच रोडचा कॉम्पेक्शन होत नाही. ज्या पद्धतीचे फिलिंग मटेरियल लागते तसे नसल्याने फाईन पार्टिकल्स टिकत नाहीत व त्यामुळे भरावाची एक एकसंधता टिकून राहत नसल्यामुळे या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे सचिव यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की सध्या तरी घाई करून पूल वाहतुकीस सुरू करणे हे सुरक्षेतेच्या कारणास्तव योग्य नाही. त्याऐवजी आता पुलाखालील कोकणाकडे जाणारी एक लेन वाढवावी. त्यामुळे त्या पद्धतीने आता पुलाखालील एका लेनचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र यावेळी अनामिका जाधव यांनीही स्पष्ट केले की, पूल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यावर एक रेडी कोट टाकला तर तो कधीही सुरू करता येईल. मात्र पाऊस थांबल्यानंतर या विषयावर काम सुरू करण्याबाबत निर्णय घेता येईल.सद्यस्थितीत पुलाखालील तात्पुरत्या वाढीव लेनचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी आपण तुला खालील सीएनजी गॅस फिलिंगसाठी जे पार्किंग केले जात आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले